कापूस भावांतर योजना जाहीर केल्याबद्दल देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनपूर्वक आभार…
महायुतीच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ व रावेर लोकसभेच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य महारॅली काढण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील यांच्यासह महायुतीचे आमदार, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भव्य अशी नामांकन सभा संपन्न झाली. यावेळी सर्वांनी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा रेकॉर्डब्रेक बहुमताने विजयी करत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करण्याची महत्वाची घोषणा केली. त्यासाठी अर्थसंकल्पात ४००० कोटींची तरतूद करण्यात आली असून आचारसंहिता संपताच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल असे त्यांनी आश्वस्त केले. तसेच जिल्ह्यातील पाडळसरे व इतर सिंचन प्रकल्पांसाठी भरघोस निधी तरतूद केली असल्याचे जाहीर केले.
सदर नामांकन सभेप्रसंगी मनोगत व्यक्त करण्याची मलादेखील संधी मिळाली. प्रधानमंत्री पीकविमा योजनेचे कवच शेतकऱ्यांना मोदिजीनी दिले, पूर्वी शेतकऱ्यांना काही रक्कम हिस्सा म्हणून भरावी लागत होती आता देवेंद्रजी यांनी रुपयात पीकविमा योजना आणून शेतकऱ्यांचा हिस्सा देखील राज्य शासन भरत आहे. यावर्षी जळगाव जिल्ह्यातील १लाख ४३ हजार शेतकऱ्यांना ३०० कोटी पीकविमा मंजूर झाला आहे, त्यापैकी ७६ कोटी खात्यात जमा झाले असून लवकरच उर्वरित पीकविमा जमा होईल. आधी १ रुपयात पीकविमा सारखी यशस्वी योजना व आता कापूस भावांतर योजनेमुळे निश्चितपणे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून खऱ्या अर्थाने महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे नमूद केले.
– आमदार मंगेश रमेश चव्हाण

















Leave a Reply