प्रतिनिधी सुधीर गोखले
कोल्हापूर जिल्ह्याला मान्सूनच्या पावसाने चांगलेच झोडपले असून पावसाने सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगलीच हजेरी लावल्याचे डन येत आहे. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे आज पहाटे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिराला पुराच्या पाण्याने वेढले असून, सध्या मंदिरात पाणी शिरल्याने आज पहाटे ३.३० वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राच्या जयघोषात लाखो भाविकांनी स्नानाचा आनंद घेतला. काल रात्री पासून नदीच्या पात्रात संततधार पावसाने वाढ होत आहे. देवस्थान प्रशासनाकडून दक्षिण द्वार सोहळ्याची माहिती प्रसारित करण्यात आली होती त्यामुळे आज पहाटे पासून भाविकांनी हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी आणि पवित्र स्नानासाठी एकच गर्दी केली. आज मंदिर प्रशासनाने वाढलेली गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवली आहे. येथील मंदिरातील आज पासून श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी वरील बाजूस असलेल्या शश्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे. नृसिंहवाडी आणि औरवाड गावाला जोडणाऱ्या जुना पूल पाण्याखाली गेला आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर बाजूने येणारे कृष्णा नदीचे पाणी श्री दत्त चरणांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडतो. या सोहळ्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. श्री चरणावरून येणाऱ्या पाण्याने स्नान केल्याने आपल्या पापांचा नाश होतो अशी एक दत्तभक्तांची श्रद्धा आहे. मात्र निसर्ग चमत्कारापुढे कोणाचे काही चालत नाही त्यामुळे हा सोहळा कधी सुरु होणार हे कोणालाच समाजत नाही. हा सोहळा दोन वेळा होतो पाणी चढताना आणि पाणी उतरताना.
Leave a Reply