Advertisement

छत्रपती शिवरायांच्या ‘आग्रा’ मोहिमेपासून तर आग्र्यावरून सुटकेपर्यंत अहिल्यानगरमधील नेवाशाची होती महत्वपूर्ण भूमिका

 छत्रपती शिवरायांच्या ‘आग्रा’ मोहिमेपासून तर आग्र्यावरून सुटकेपर्यंत अहिल्यानगरमधील नेवाशाची होती महत्वपूर्ण भूमिका

प्रतिनिधि रवि कुमार शिंदे


नेवासे तालुक्यातील खेडले परमानंद गाव हरिश्चंद्रगडावरून उगम पावलेल्या मुळा नदीच्या काठावर वसलेले. या ठिकाणी असणाऱ्या शिवभारत ग्रंथाचे लेखक कवी परमानंद यांच्या ऐतिहासिक मठास पानिपत ग्रंथाचे लेखक विश्वास पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर या ठिकाणचे महत्व आणखी अधोरेखित झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या अगोदर उत्तर भारतातील स्थितीचा अभ्यास करण्यासाठी परमानंद यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदरच उत्तर भारतात पाठवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यातील एक अधिकारी म्हणून परमानंद यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
आग्र्याच्या कैदेतून सुटका झाली त्यावेळेस वेशांतर करून महाराजांना महाराष्ट्रात येण्यापर्यंतची जी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यामध्ये परमानंद यांची मोलाची कामगिरी आहे. उत्तर भारतातून परतीच्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज नेवासा तालुक्यातील कवी परमानंद यांच्या मूळ गाव असलेल्या खेडले परमानंद या ठिकाणी थांबले होते अशी माहिती मिळते.

कवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत या मूळ संस्कृत ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेचे वर्णन सप्रमाण पाहावयास मिळते. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात शिवभारत ग्रंथाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हरिश्चंद्रगडावरून उगम पावलेल्या मुळा नदीच्या काठावर खेडले परमानंद हे गाव वसलेले आहे.
भक्कम तटबंदी बरूज, भव्य पुरातन प्रवेशद्वार, ध्यानमंदिर, प्रवेश करताच उजव्या बाजूला असणारे शिवमंदिर, ध्यान मंदिराच्या पश्चिमेस कवी परमानंद यांची समाधी, तत्कालीन मोठा कार्यक्रम असल्यास बैलाच्या साह्याने जात्यावर दळले जायचे असे जुने ऐतिहासिक जाते, वरवंटा असा मठाचा मोठा ठेवा शिवकालीन इतिहासाची साक्ष देत आहे.

शिवकालीन इतिहासाचा सखोल माहितीचा आधार म्हणून शिवभारत ग्रंथ हा महत्त्वपूर्ण ठरला आहे. परिपूर्ण सखोल माहिती शिवभारत ग्रंथातून शिवकालीन इतिहासाचे दर्शन घडवून देतो. अशा थोर इतिहास लेखन करणाऱ्या कवी परमानंद यांच्या ऐतिहासिक वास्तूची पाहणी करण्यासाठी व भेट देण्यासाठी जेष्ठ इतिहास अभ्यासक पानिपत ग्रंथाचे लेखक विश्वास पाटील यांची भेट ग्रामस्थांसाठी व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरली आहे. सदरच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांना संबोधित करताना विश्वास पाटील म्हणाले की तुमच्या गावाला जो ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे त्याचे संवर्धन करा जतन करा ऐतिहासिक दृष्ट्या ही वास्तू अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!